पुणे : कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला आहे. कारण सत्ता डोक्यात गेलं की जनतेला गृहित धरलं जातं आणि  त्यांनी कोथरूडकरांना गृहित धरलं. कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो. चंद्रकांत पाटील कोल्हापुरातले आहेत तर ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला त्यांना भीती का वाटली? असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरूड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.


सत्ता डोक्यात जाते तेव्हा अशा कृती केल्या जातात असा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राला काय झालं आहे ते मला समजत नाही. महाराष्ट्राचा तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. एवढंच नाही तर कोथरुडची निवडणूक तुम्हा सगळ्यांसाठी सोपी आहे. तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटील हे मतदारांच्या हाती तरी लागणार का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.

महापुरुषांचीही  जातीनिहाय वाटणी करण्यात येत आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाजी महाराज मराठ्यांचे, सावरकर ब्राह्मणांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे अशी जातीनिहाय वाटणी केली जाते आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे आज या महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न पडतो असंही राज ठाकरे म्हणाले. मध्यंतरी पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यात उद्ध्वस्त केला गेला. ज्यांनी उमेदवार हा उद्ध्वस्त केला त्यांना राम गणेश गडकरी माहित आहेत का ?आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.