Raj Thackeray Pune Rally 10 IMP Points: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहातील सभेत जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी अयोध्या दौऱ्याबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, एमआयएमवर जोरदार टीका केली.  पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे



  1. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. 


  2. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही


  3. ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही


  4. मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार


  5. राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? . मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत.


  6. आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? 


  7. मला वाटलं औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचा माणूस गेल्यावर महाराष्ट्र खवळेल. पण महाराष्ट्र थंडच. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात. त्याची एवढीशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघून या. त्याचा विस्तार आज 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजलखानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. त्यासाठी फंडिंग येतंय. हे फंडिंग देणाऱ्या अवलादी कोण आहेत? कारण आम्ही शांत बसलो आहोत. आम्हाला कसलंही देणं-घेणं नाहीये. आम्ही लोण्याचे थंड गोळे आहोत.





  8. मागच्या सभेत मी म्हणालो होतो की पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव बदलून टाका. यांचं राजकारण एकदा मोडीतच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली.











  9. मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.


    10. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.