निवडणुकीत भाजप आपट्याची पानं वाटणार का? : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2016 11:51 PM (IST)
मुंबई : काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्दबातल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. 'सरकारचा जो काही निर्णय आहे, तो ठीक आहे पण येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजप सरकार काय आपट्याची पाने वाटणार आहेत काय?' असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.