मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्राजवळ लोकल (Local) रेल्वेचा भीषण अपघात झाला असून 4 जणांचा मृत्यू झाला. येथील धोकादायक वळणावर दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्याने 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यामध्ये, 4 जणांना आपला जीव गमावावा लागला असून 9 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रवासी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी, रेल्वे प्रशासनांचं वास्तवच मांडलं आहे. तसेच, या घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा रेल्वे मंत्र्‍यांची येथे येऊन स्थिती पाहावी, असेही राज यांनी म्हटले. दरम्यान, घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत मनसेनं उद्या जाहीर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मुंब्रा रेल्वे दुर्घटना विरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा (MNS) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिली. 

मुंबईत आज जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळाची मागणी केली आहे. शहरांचं नियोजन आज पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये. आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, असे राज ठाकरेंनी म्हटलं. 

आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का?

मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही, असेही राज यांनी म्हटले. 

रेल्वे प्रशासनावर मनसेचा बेधक मोर्चा

मुंब्रा रेल्वे दुर्घटना विरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार. आमच्या एका टिटवाळ्याच्या मनसैनिकांनी या आधी देखील त्या मुंब्रा रेल्वे भागात मोठा अपघात होऊ शकतो असे पत्र दिले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवला. जर प्रशासनाने त्या पत्राची दखल घेतली असती तर ही घटना झाली नसती, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं. या सर्व प्रसंगांमधून प्रवाशांना आणि नागरिकांना बाहेर यायचं असेल तर या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन देखील अविनाश जाधव यांनी केले.

रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार

मुंब्रा स्थानकाजवळील आजची घटना दुःखदायक आहे,  आम्ही आज रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली आहे. उद्या ठाण्यामध्ये धडक मोर्चा होतोय. तसेच उद्या नांदगावकर यांच्या नेतृत्वात आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहोत. आम्ही आशा घटना होऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहोत. आमचं इंजिन हे आता रेल्वे प्रशासनाला जोडावे लागणार आहे, असे मनसेच्या रेल्वे कामगार सेनेनं म्हटलं आहे. 

हेही वाचा

वळण धोकादायक, पिक अवरमध्ये 6000 प्रवासी असल्याने लोकल एका बाजुले झुकते; प्रवासी संघटनेनं मांडलं वास्तव