सोलापूर: राज्यात अवकाळी पावसाचा जोर सुरूच आहे. उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. तर तिकडे सोलापूर शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यात मळणगांव आण शिरढोण भागातही जोरदार पाऊस झाला.


अवकाळी पावसामुळे पंढरपुरात केळी बागांना फटका

पंढरपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे पेहे परिसरातील केळीची 1400 झाडं जमीनदोस्त झाली असून सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. जिवापाड जपलेल्या बागा डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. शनिवारी झालेल्या या नुकसानीची प्रशासनाकडून अद्याप कोणतही दखल घेतली गेली नाही. त्यामुळं लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरु

अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरु झाला आहे. अनेक भागात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक संयुक्तपणे पंचनामा करत आहेत.  पंचनाम्यानंतर जीवित, वित्तहानीचा आकडा समोर येणार आहे. सरकारकडून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टर ६ हजार ८०० रुपये तर बागायत क्षेत्राला हेक्टरी १८ हजार इतकी मदत केली जाणार आहे.  याशिवाय वीज पडून मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला ४ लाख, दुभत्या जनावरांच्या मृत्यूसाठी १८ हजार इतकी मदत दिली जाणार आहे. पंचनामे झाल्यानंतर अंदाजे २ महिन्यात मदत मिळेल. अशी माहिती आहे.