मुंबई : मुंबई उपनगर आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. यात अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, सांताक्रूज परिसरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. शिवाय ठाणे,भिवंडी, कल्याण, पवई, चांदिवली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबईकरांना दिलासा आहे.


मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पावसानं दमदार बॅटिंग जरी केली असली तरीही वाहतूक मात्र धीम्या गतीनं सुरु आहे. यातच शनिवारी रात्री पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसरजवळ टेम्पो स्लीप होऊन पलटी झाला. या टेम्पोतील चौघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या अपघातामुळे हायवेवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

पहाटेपासून पावसानं काही काळ उसंत घेतली असली तरीही आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातही ठिकठिकाणी पावसाची दमदार हजेरी

खान्देशातील नंदुरबारमध्ये तब्बल 15 दिवसांनी पावसानं दमदान वर्दी दिली. नंदुरबारसह तळोदा आणि नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पालघर : विक्रमगड तालुक्यातील कुंऱझे गावासह 20 गाव आणि पाडयांचा संपर्क तुटला आहे. तसंच देहर्जे नदीवरील पूल गेल्या 48 तासांपासून पाण्याखाली गेला आहे. या परिसरात 48 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. कुंर्झे कडून वाडा कड़े जाणारा रस्ता बंद झाले आहेत, तर विक्रमगड मनोरकड़े जाणारे रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले आहेत.