पाहा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पावसाच्या लाईव्ह अपडेटः


मागील 24 तासात अंबाजोगाई तालुक्यात 48 मिमी पाऊस झाला. एकूण पाऊस 858 मिमी झाला. जो वार्षिक सरासरीच्या 120% इतका आहे. सर्वाधिक 90 मिमी पाऊस बर्दापूर मंडळात झाला. त्यामुळे अनेक गावात शेतीपिकाचे नुकसान झाले.

- रेणापूर 12, अहमदपूर 10 आणि नांदेडमध्ये 8 जण अडकले आहेत. सर्व प्रकारचं बचावकार्य सध्या सुरु आहे, मुख्यमंत्र्यांची माहिती
- 'लातूर नांदेडच्या पूर परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विटरवरुन माहिती

- लातूर-नांदेड वाहतूक बंद, भातखेडा पुलावरुन पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद

- नांदेडहून सोलापूर, पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

- डोंगरगाव येथे अडकलेल्या 8 जणांच्या सुटकेसाठी NDRF चे पथकही रवाना

वागदरवाडी येथील पाझर तलाव फुटून अंदाजे 50 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी व तहसिलदार शरद झाडके यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी धसवाडी, सेलूअंबा, पोखरी येथील पाझर तलावास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन तलाव फुटू नये म्हणून उपाययोजना केली. मांजरा धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाची 6 दरवाजे 1.50 मिटर उघडण्यात आले. केज तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या नायगाव, ईस्थळ व सौंदना या गावाना तहसिलदार अविनाश कांबळे यानी भेटी दिल्या व लोकांना सतर्कतेच्या सूचना केल्या.

अंबाजोगाई जवळील शामनगर भागात 5-6 घरे पाण्याखाली गेली होती. तेथे जाऊन जेसीबी मशीनने पाणी काढण्यात आले. अंबाजोगाई व केज तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना लोकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन्ही तहसील कार्यालयातील कंट्रोल रूम 24 तास सुरू राहणार आहे. उद्या रविवारी सर्व अधिकार व कर्मचारी यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- लातूर-रेणापूर-सेलू जवळगा गावातून सर्व ग्रामस्थांना हलवले, भंडारवाडी धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी गावात घुसल्याने प्रशासनाची कारवाई

- नांदेड: नायगाव तालुक्यातील हुस्सा येथे वीज कोसळून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

- नांदेडमधील डोंगरगाव येथे अडकलेल्या 13 लोकांच्या सुटकेसाठी हेलिकाॅप्टर दाखल




- लातूर जिल्ह्यातील पावसाचा फटका, नांदेड जिल्ह्याला, मन्याड नदीला पूर, डोंगरगाव इथं एका शेतात 13 लोक अडकले, प्रशासनाकडून हेलिकॉप्टर पाठवण्याची सरकारला विनंती

- लातूरमधील खरोळा येथील पूल वाहून गेला. खरोळा ते आष्टमोड बामणी मार्गावरील वाहतूक ठप्प



- नांदेडमधील देगलूर येथील फुले नगर भागातील 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू

- परतीच्या पावसानं चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. काल रात्रीपासून मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

- लातूर जिल्ह्यात रेणापूर, जळकोट, उदगीर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातल्या ओढे आणि नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. जळकोट तालुक्याला त्याचा फटका बसला आहे. बोरगाव खुर्द गावातील मंदिरात पाणी आलं आहे. तर औरादमध्येही पावसाचा जोर कायम आहे. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत, मांजराकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



- तिकडे बीडमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. घाटनांदूर परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे.

-------------

लातूरः  रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील लेंडी नदीवरील पूल गेला वाहून आहे. त्यामुळे खरोळा ते आष्टमोड बामणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेणापूर येथील सेवादासनगर तांड्यातही पाणी शिरलंय. त्यामुळे अनेक घरात पाणीच पाणी झालं आहे.



लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा नदी पात्रात पुन्हा एकदा पूरस्थितीनिर्माण झाली आहे. त्यामुळे नदीवरील अनेक ठिकाणच्या बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. तगरखेडा उच्चस्थरीय बंधाऱ्याची पूर्ण सहा दारे, मदनसुरी बंधाऱ्याची एक मीटरने 4 दारे, गुंजरगा बंधाऱ्य़ाची पूर्ण सहा दारे, किल्लारीची 2 मीटरने 4 दारे उघडली आहेत. तर लिंबाला धरणाचीही दारे उघडण्यात आली आहेत.


 

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात 75 मिमी पावसाची नोंद, नद्या-नाल्यांना पूर

बीड जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, यंदा सरासरीच्या 111.1 टक्के पावसाची नोंद, सर्वच तालुक्यात पाऊस

तेरणा नदीवरील आठही उच्च स्तरीय बंधाऱ्याची दरवाजे उघडले. नदी पात्रात चार मीटर उंचीने पाणी वाहत आहे.

मांजरा नदीवरील बॅरेजेसचे आठही उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाच मीटरने पाणी वाहत आहे.

-------------------------------------------

लातूरः मराठवाड्याचा दुष्काळ धुवून लावल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उस्मानाबादसह लातूर शहर आणि परिसराला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.

लातूरच्या अहमदपूर तालुक्यात जोरात पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसंच मानार नदीकाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये पावसाने रात्रभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर सकाळी उघड घेतली आहे.



बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस आहे. सध्या बीड शहर आणि परिसरात पाऊस थांबला असला तरी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परभणी आणि जालन्यात ढगाळ वातावरण आहे. मात्र अजून पावसाला सुरुवात झालेली नाही.