रायगडमध्ये महाप्रसादातून विषबाधा, तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2018 07:43 AM (IST)
महडमध्ये वास्तुशांतीच्या पूजेच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तिघा चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले
रायगड : रायगडातील महडमध्ये पूजेच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तीन चिमुरड्यांसह चौघांना जीव गमवावा लागला. खालापूर तालुक्यातील महडमध्ये माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला. जवळपास 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत दुर्दैवाने तीन लहान मुलांसह चौघा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महड परिसरात शोककळा पसरली आहे.