shiv sena mla disqualification verdict Rahul Narwekar :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपत्रा प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचं सागितलं. त्याशिवाय भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. त्यांनी ठाकरे गट अथवा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही. याबाबत त्यांच्यावर टीकाही झाली. यावरच राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले. एबीपी माझाशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी तीन मुद्द्यांच्या आधारावर कुणालाही अपात्र ठरवलं नाही, असे सांगितलं. त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. 


राहुल नार्वेकर यांनी खालील तीन मुद्द्याच्या आधारावर पात्र, अपात्र ठरवले -


व्हिप ज्याने बजावला त्याला राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का?


व्हिप ज्यांनी बजावला, त्यानंतर तो व्यवस्थित पोहचला का ?


जो व्हिप इश्यू केला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख (आदेशाचा आणि उल्लंघन केल्यास परिणामाचा) आहे का? 


या तीन गोष्टी पाहण गरजेचं आहे. त्यामुळे संविधानातल्या तरतुदीनुसार दोन-तीन फिल्टर आहेत. अपात्र ठरवण्यापूर्वी मी हे ठरवलं की,व्हीप हा भरत गोगावले ना द्यायचा अधिकार होता.  त्यांचा अधिकार असल्यामुळे त्या व्हीपची अंमलबजावणी अथवा विरोधात मतदान झालेय. अथवा पक्षविरोधी कारवाई झाली आहे का? हे त्यातून दिसून येऊ शकतं, परंतु तो व्हीप योग्यरीत्या बजावला गेला नसेल. तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या आधारावरती समोरच्याला जर तुम्ही कळवलाच नाहीत तर त्याच्याकडून त्या अपेक्षित कार्याची तुम्ही अपेक्षा कशी करू शकता. हा प्रश्न आहे. त्यामुळे भरत गोगावले यांनी दिलेला पक्ष आदेश योग्यरित्या ठाकरे गटाच्या आमदारांपर्यंत पोहचवला गेला नव्हता, हे सिद्ध होत होतं. म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करता येतं नव्हतं, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. 
 
गोगावलेंचा व्हीप वैध कसा ठरवला, राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण!
सुप्रीम कोर्टानं सुनिल प्रभु यांची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवला अन् गोगावलांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा  समज गैरसमज समाजात पसरवला जातोय. कोर्टानं असे म्हटले की, ज्यावेळी नरहळी झिरवळ यांनी सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांना निवडलं, त्यावेळी 21 जून 2022 रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचं पत्र होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचं पत्र नव्हतं. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी दोघांची निवड केली. पण 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला. त्यावेळी अध्यक्षांकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोघांची पत्रे होती. राहुल नार्वेकर यांना पक्षात फूट पडली अशी कल्पना होती. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी  केवळ विधिमंडळातील ताकद पाहून गोगावले आणि शिंदेंची केलेली निवड चुकीची आहे. कारण, त्यावेळी नार्वेकरांनी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायला हवं. त्यामुळे राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवला, प्रतोद आणि पक्षनेता ठरवल्यामुळे तो भाग चुकीचा असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावं, आणि त्यांनतर प्रतोद आणि विधिमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा गैरसमज जो पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन्स पळून १०० टक्के दिला. 



नेमका निकाल काय ?


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन बुधवारी पार पडलं.  एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.