मुंबई: राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचं (Bharat Jodo Nyay Yatra) आज महाराष्ट्रात आगमन होणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज महाराष्ट्राचा दौरा नंदुरबारमधून सुरुवात करत आहेत. या भारत जोडो यात्रेला आता भारत जोडो न्याय  यात्रा असे नाव देण्यात आले आहे. 


मागच्या दहा वर्षाचा अपवाद वगळता नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.त्यामुळे अगदी नेहरूंपासून गांधी घराण्यातील सगळ्याच व्यक्तींचा नंदुरबार जिल्ह्याशी जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय. मात्र मागच्या 14 वर्षांमध्ये गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती हा नंदुरबार मध्ये आला नव्हता.म्हणूनच विशेषता आदिवासी बांधवांमध्ये राहुल गांधी यांच्या आगमनाची मोठी प्रतीक्षा होती. ती आज पूर्ण होणार आहे. 


शरद पवार उपस्थित राहणार


राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला 14 मार्च रोजी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात यात्रा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी शरद पवार राहुल गांधींना भेटणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार आणि राहुल गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.


मुंबईत शिवाजी पार्कवर होणार भव्य सभा


राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मुंबईत महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथे 17 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपवेळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाची  नेत्यांनासुद्धा निमंत्रण काँग्रेसच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे मोठे शक्तीप्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून या निमित्ताने केलं जाईल. 


राहुल गांधी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम


- 11.20 वाजता दिल्ली ते सुरत.


- 13.10 वाजता सुरत विमानतळावर आगमन.


- 13.10 ते 14.00 सुरत नंदुरबार हेलिकॅप्टरने प्रवास.


- 14.00 वाजता पोलीस मुख्यालय येथील हेलीपॅडवर आगमन.


- 14.00 ते 15.00 रोड शो (धुळे चौफुली ते सभा स्थान).


- 15.00 ते 15.30 ध्वज हस्तांतरण कार्यक्रम.


- 15.30 ते 15.45 सांस्कृतीक कार्यक्रम (होळी पूजन).


- 15.45 ते 16.30 उपस्थित जनसमूदयाला मार्गदर्शन.


- 16.30 नंतर राहुलजी गांधी यांचे दोंडाईचाकडे प्रयाण.


ही बातमी वाचा: 


Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता ना कोणाकडे तक्रार ना अपेक्षा; वसंत मोरेंची खदखद, मध्यरात्री लिहिलेली ती पोस्ट नेमकी कुणासाठी?