Raghunath dada patil on Bachhu Kadu : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राज्यात शेतकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. याच मुद्यावरुन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunath dada patil) यांनी त्यांच्यावर टीका केलीय. 50 खोके घेणाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करत नाही आणि त्यांचं नाव देखील मी घेत नाही अशी प्रतिक्रिया रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. तर राजू शेट्टींना (Raju Shetti) देखील रघुनाथदादा पाटील यांनी टोला लगावलाय. 


राजू शेट्टींना शेतकऱ्यांच चांगल समजतं, रघुनाथदादा पाटलांचा टोला


शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे जालना इथं आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 9 ऑगस्ट रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील आयुक्त कार्यालयावरती ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले होते. यासबंधित प्रश्नावर बोलताना 50 खोके घेणाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करत नाही. त्यांचं नाव देखील मी घेत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचा आवाज बनत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांना शेतकऱ्यांच चांगल समजतं असे आम्ही समजतो असा टोमणा देखील रघुनाथदादा यांनी लगावला. 


9 ऑगस्टला बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार


येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत. प्रहाक जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी मोठी घोषणा सध्या शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच, येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे. जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


येत्या विधानसभेत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी; बच्चू कडूंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंनाही खुलं आमंत्रण