खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 02:41 AM (IST)
मुंबई: 'महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य पाहता त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फच केले पाहिजे.' असं वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 'भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम असेल तर त्यांना तातडीने सरकारमधून काढून टाकून त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी करावी.' अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. 'पुणे येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंनी मंत्रिप्रदाचा दुरूपयोग करून आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे निरर्थक असून त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणं आवश्यक आहे.' असे विखे-पाटील म्हणाले.