मोबाईलवर बोलताना अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 02:15 AM (IST)

कोल्हापूर : कोल्हापुरात मोबाईलवर बोलणाऱ्या एका इसमाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश पाटील असं घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पाटील पत्नी आणि मुलीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी ढगाळ वातावरण झालं आणि लगेच मेघगर्जनेसह पाऊसही सुरु झाला. त्याच वेळी त्यांना मोबाईलवर कॉल आला. त्यांनी तो कॉल घेतला आणि अचानक विजेचा कडकडाट होऊन एक वीज त्याच्या दिशेनं झेपावली. काही समजण्या आधीच वीज त्यांच्या अंगावर कोसळली. त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी आणि मुलगी वेगाने त्याच्यापासून दूर फेकल्या गेल्या. पाटील यांना तात्काळ कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाटील मुळचे नाशिकचे असून कोल्हापूरमध्ये ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामाला होते. मोबईल लहरींमुळे वीज आकर्षित झाली का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीज कडाडत असताना मोबाईलधारकांनी याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे.