कृषी आणि पणनमंत्र्यांची हकालपट्टी करा : विखे-पाटील
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2017 01:21 PM (IST)
सांगली: तूर खरेदीच्या मुद्यावरून सरकारने पणन मंत्री सुभाष देशमुख आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विरोधकांची संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विखेंचा सरकारवर हल्ला "राज्यातील कोणताच घटक सुखी नाही, शेतकरी तर उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यावर उपकार करतोय अशा थाटात सरकार तुरीचा विषय हाताळत आहे. जय जवान, जय किसान या घोषणेला भाजपने हरताळ फासलाय" असा हल्ला विखे पाटलांनी चढवला. शिवसेनेचे मंत्री शेतकरी कर्जमाफीवर ढिम्मपणे बसून असतात. खरंच कर्जमाफी हवी असेल तर राजीनामे देऊन या यात्रेत सहभागी व्हावे, अशी ऑफरही त्यांनी दिली. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तोंडावर पट्टी बांधली आहे. या लोकांनी स्वाभिमानी हा शब्द काढून टाकावा असा घणाघात विखेंनी केला. सदाभाऊ खोत यांना भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाली आहे. धनगर समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप विखेंनी केला. माजी मंत्री आर.आर.आबांची या यात्रेच्या निमित्ताने आठवण येत आहे. यात्रेच्या माध्यमातून कर्जमाफी घेणारच. कर्जमाफीसाठीच विशेष अधिवेशन बोलवण्याची आम्ही मागणी करतोय. उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संबंधित बातम्या