पुणे : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेली सामूहिक बलात्काराची घटना बनाव असल्याचं समोर आलं आहे. वैयक्तिक भांडणातून दोन गुंडांनी महिलेला हाताशी धरुन दोन तरुणांना अडकवण्यासाठी हा बनाव रचला होता.


जेजुरी मार्गावर शिंदवणे घाटात शुक्रवारी रात्री लिफ्टच्या बहाण्याने फॉर्च्युनर गाडीत दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. पण नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे या गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हा कट रचल्याचं उघड झालं आहे.

प्रकाश चव्हाण आणि अजय नवले या दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी परिसरातीलच एका महिलेला हाताशी धरुन बलात्काराचा कट रचल्याचं पोलिस तपासात स्ष्ट झालं. तर बलात्काराच्या घटनेची साक्ष देणारे दोन तरुणही पैसे देऊन आणले होते. तर दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे यांच्या सांगण्यावरुन खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली संबंधित महिलेने दिली आहे.

देवदर्शन करुन नारायणपूरहून परतत असताना, एकटी असल्याचं पाहून फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर शिंदवणे घाटात दोघांनी बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली होती. शिवाय त्या दोघांना आणि गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही ही उभे केले होते.

मात्र महिलेच्या तक्रार त्रुटी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. त्यानंतर अधिक तपास केला असता, प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी कट रचल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी अवघ्या 48 तासात या प्रकरणचा उलगडा केला.

चव्हाण आणि नवले यांच्याशी दादा गव्हाण यांचा काही वर्षांपासून वाद सुरु आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी गव्हाण आणि जगदाळेनी त्या दोघांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर महिलेला आणि दोन तरुणांना सोबत घेऊन गव्हाण आणि जगदाळेने बलात्काराचा बनाव रचला.

पोलिस तपासात महिलेची तक्रार बनावट असल्याचं जाणवलं आणि कट उघड झाला. पोलिस सध्या दादा गव्हाण आणि संदीप जगदाळे यांच्या शोधात आहेत.

संबंधित बातमी

पुण्यात फॉर्च्युनरमध्ये गँगरेप, शिंदवणे घाटात धक्कादायक प्रकार