पुणे: पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटमध्ये पोलिसांच्या सहभागाने खळबळ उडाली आहे.


जुन्या नोटा बदलून देण्यारं रॅकेट पुण्याच्या कोथरुडमध्ये उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये कोथरुड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप आहे.

कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उप-निरीक्षक विक्रम राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल हेमंत हेंद्रे यांच्यासह आणखी तीन कॉन्स्टेबल अशा एकूण 5 जणांविरुध्द चौकशी सुरु करण्यात आली आहे. या पाच जणांनी पुण्यातील व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये बदलून दिल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली ती दोन फेब्रुवारीला. कोथरुडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही व्यक्ती जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणार असल्याचं समजल्यावर, विक्रम राजपूत यांनी त्याठिकाणी सापळा रचला.

त्यावेळी व्यापाऱ्यांबरोबर त्यांना कॉन्स्टेबल हेमंद्र हेंद्रेही आढळून आला. त्याठिकाणी असलेल्या एका स्कोडा गाडीत 84 लाख रुपये होते. तर इतर गाड्यांमधे कोट्यावधी रुपये होते.

विक्रम राजपूत यांनी कारवाई करण्याऐवजी व्यापाऱ्यांसोबत सौदा केला आणि केवळ 22 लाख रुपयांच्या नोटा सापडल्याची नोंद पोलिस स्टेशनला केली.

परंतु ना कोणत्या व्यापाऱ्यावर कारवाई केली, ना या प्रकरणात गुन्हा नोंद केला.

हे सगळं प्रकरण माध्यमांपर्यंत पोहचू नये याची पुरेपुर काळजी घेण्यात आली.  परंतु वरिष्ठांना याची कुणकुण लागल्याचं ध्यानात आल्यावर, प्रकरण आपल्यावर शेकू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले.

व्यापाऱ्यांकडे असलेली 1 कोटी 36 लाख रुपयांची रक्कम, पुण्यातीलच दिघी पोलिसांनी २४ फेब्रुवारीला जप्त केल्याचं पोलिसांनी कागदोपत्री दाखवलं. परंतु दोन फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलिसांनी कारवाई करण्यास वेळ का लावला हा प्रश्न उपस्थित होतोय.

ही सर्व रक्कम पोलिसांच्या ताब्यात असून त्याची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्यात आली आहे.

पुण्याच्या रास्ता पेठेत गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे सुरेश अग्रवाल, फर्निचरचा व्यापार करणारे वर्धमान पुंगलीया, आनंद संचेती आणि सुनील पाटील या व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचं उघड झालंय.

आश्चर्याची बाब म्हणजे कोथरुड पोलिसांनी जप्त केलेली रक्कम ही त्यांना स्कोडा गाडीत सापडली. मात्र गाडीत ही रक्कम कशी आली हे आपल्याला माहिती नाही असं अग्रवालने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही त्यावर विश्वास ठेवला.

20 ते 22 दिवस हे प्रकरण उघडकीस न आल्याने या प्रकरणात फक्त पाच पोलिस कर्मचारीच सहभागी आहेत की आणखीही काही वरिष्ठ पोलिस अधिकारी यात अडकलेत असा प्रश्न उपस्थित होतोय.