दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण
एबीपी माझा वेब टीम | 04 Jun 2016 07:20 AM (IST)
मुंबई : केवळ एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही, तर त्यांची दाऊद कॉलप्रकरणात चौकशी होणं आवश्यक आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. खडसेंविरोधात भक्कम पुरावे होते, त्यामुळे राजीनामा देणं आवश्यक होतंच. मात्र केवळ राजीनामा नको तर त्यांची चौकशी व्हावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच खडसेंविरोधात अनेक पुरावे होते, त्यामुळे जातीच्या राजकारणातून खडसेंचा बळी घेतला असं मी म्हणणार नाही, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भोसरीतील जमीन व्यवहारापेक्षा दाऊद कॉलप्रकरण गंभीर आहे. त्याची केंद्राने चौकशी करुन स्पष्टीकरण द्यावं. हा मुद्दा देशाच्या सुरक्षेचा आहे, त्यामुळे कदाचित हे प्रकरण पुढे येऊ नये, म्हणूनच खडसेंचा राजीनामा घेतला की काय, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. खडसेंचा राजीनामा अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या एकनाथ खडसे यांची अखेर गच्छंती झाली आहे. आरोपांचं च्रकव्यूह भेदण्यात अयशस्वी ठरलेल्या खडसेंनी सर्व मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.