कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र यात्रा येत्या 31 मार्चला जोतिबा डोंगरावर भरणार आहे. 10 लाखांहून अधिक भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. या यात्रेची जय्यत तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे.


31 मार्च रोजी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी इथं दख्खनच्या राजाची चैत्र यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून 10 लाखांहून अधिक भाविक यात्रेच्या दरम्यान दाखल होत असतात. यात्रेपूर्वी मनाच्या सासन काठ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पारंपरिक वाद्याच्या गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत हळूहळू गर्दी जमू लागली आहे. यात्रेनिमित्त मंदिरातील रंगरंगोटी पूर्ण झाली असून रणरणत्या उन्हातून दर्शन रांगेत उभे असणाऱ्या भाविकांच्या उन्हाचे चटके बसू नये म्हणून कुल कोटचा एक थर मारण्यात आला आहे. मंदिरा लागत असणाऱ्या दर्शन रांगेवर मंडप घालण्यात आला आहे.

तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ड्रोन कॅमेऱ्याची नजर मुख्य दिवशी राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं यंदा पहिल्यांदाच सासन काठ्यांची उंची कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तसंच खोबऱ्याच्या वाट्या फेकण्यावर बंदी घालण्यात आली असून खोबऱ्याचे बारीक तुकडे उधण्याला परवानगी देण्यात आली आहे. तसंच संपूर्ण मंदिर परिसरात प्लस्टिक बंदी करण्यात आली आहे.

जोतिबा डोंगरावर मानाच्या सासन काठ्या सोबत भाविक मोठ्या संख्यने दर्शनासाठी डोंगरावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळी जोतिबाच्या नावाने चांगभलंचा गजर करत पुई ढबाक बाजवण्यात येत आहे.

आज देवस्थान समिती अध्यक्ष , पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी जोतिबा मंदिर परिसराची पाहणी केली. ज्या ठिकणी कामात त्रुटी आढळल्या आहेत, त्या ठिकाणी त्रुटीविरहित काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.