मुंबई : राज्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यासह विदर्भातही पावसाने हजेरी लावली.


सोलापूरमध्ये आज संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.  टेंभुर्णी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असलं तरीही उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसामुळे पुणे-सोलापूर हायवेवरील वाहतूकही ठप्प झाली. अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे.



उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. उकाड्याने त्रस्त उस्मानाबादकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

लातुरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मागील 4-5 दिवसांपासून जिल्ह्यात तापमान वाढले होते. लातूरचं तापमान 42 अंशापार गेलं होत्या ज्यामुळे प्रचंड उकाडा वाढला होता. आज संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मात्र पावसासोबत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

या पावसामुळे वातावरणातील उकाडा काही अंशी कमी झाल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. पावसाच्या सरींमुळे उन्हापासून त्रस्त हिंगोलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली. घाटंजी तालुक्यात वादळी वारा आणि पावसाने मोठं नुकसान केलं आहे. तर दत्तपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सुद्धा या पावसामुळे कोसळले आहे.

चंद्रपूरमध्ये बरसलेल्या पावसाच्या सरींनी काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा 48 डिग्री तापमान सहन केलेल्या चंद्रपुरात आज संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वातावरणात सुखद बदल झाल्याने नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे  वाढत्या तापमानाने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा का होईना, दिलासा मिळाला आहे. या पावसाने शहरात काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत.