नागपूर : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आता कुठलेही आंदोलन केले जाणार नाही, अशी भूमिका हिंदू विश्व परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी जाहीर केली आहे. ते नागपुरात बोलत होते.


तोगडिया नेमके काय म्हणाले?

“अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी आता कुठलेही आंदोलन करण्यात येणार नाही, कोणीही कार्यकर्ता पोलिसांची गोळी खाणार नाही, कोणी ही तुरुंगात जाणार नाही, तर राम मंदिर निर्माण करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची असून सरकारने संसदेत कायदा करून अयोध्येत राम मंदिर निर्माण करावे.”, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी न्यायालयाचा निर्णयच मान्य होणार होता, तर मग यापूर्वी आंदोलन का केले, असेही तोगडिया यांनी विचारले.

राम मंदिरासंदर्भात संसदेत कायदा करावा या मागणीसाठी पंतप्रधान यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.

याचबरोबर, देशातील 20 कोटी बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, सर्वांना शिक्षा मिळावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशीही मागणी डॉ. तोगडिया यांनी यावेळी केली.

देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4 वर्षांपूर्वी 6 हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारा दर आता 4 हजारांवर आला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दखल घेण्याची गरज असल्याचे तोगडिया यांनी यावेळी सांगितले.