मुंबई: आताच्या 'सेक्युलर सरकार'मधील मोठ्या व्यक्तीने दाभोलकर हत्या प्रकरण दाबले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 20 तारखेला प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, आज डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय असं म्हणतात. पण, आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.


आंबेडकर यांनी पुढं म्हटलं आहे की, पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का? समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरे विरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी

या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखुन निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र आदरांजली, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हत्येला सात वर्षे पूर्ण,  दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी सात वर्षे पूर्ण झाली. मात्र तरीही दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक जारी केलं आहे.


खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. खुनाला सात वर्षे झाल्यानंतरदेखील सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून अजूनही खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही ही अत्यंत वेदनादायी बाब आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.

डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आधी या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांनी केला. मात्र, आरोपी सापडत नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला. परंतु सात वर्षे पूर्ण होऊनही सीबीआयला खुनाच्या मास्टरमाईंडला शोधण्यात यश येत नसल्याने तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सीबीआयने लवकरात लवकर मुख्य आरोपीला पकडावं, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीय करत आहेत.