मुंबई : राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज (शनिवार) ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे गावागावात आता छुप्या रणनीतीसाठी चर्चा-बैठकांना ऊत आला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 16 तारखेला होईल. तर मतमोजणी 17 तारखेला होणार आहे. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समोर येणार आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत. कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी मतदान?  नाशिक - 170  धुळे - 108 जळगाव - 138 नंदुरबार - 51 औरंगाबाद - 212 बीड - 703 नांदेड - 171 परभणी - 126 जालना - 240 लातूर - 353 हिंगोली - 49 अमरावती - 262 अकोला - 272 वाशिम - 287 बुलडाणा - 280