मुंबई : आज भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी शहीद पोलिस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.


21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते.  जिल्ह्याच्या मुख्यालयात या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन केले जाते. तसेच विविध उपक्रमाचे आयोजनही केले जाते.


का साजरा केला जातो हा दिवस
21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 जवान गस्त घालत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेने देशात दु:खाची लहर पसरली होती. वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.


महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्र पोलिसांनी अभिवादन केलं आहे.





देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता बलिदान देणाऱ्या शूर योद्धांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.