मुंबई : महाराष्ट्रभरात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली. मात्र या बंदीचा प्लास्टिक उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्लास्टिकबंदीमुळे या उद्योगाला 15 हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज असून, जवळपास 3 लाख नोकऱ्या धोक्यात आहेत.


महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे प्लास्टिक आणि थर्माकोल उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. 15 हजार कोटीचे नुकासान अंदाजित असून, जवळपास 3 लाख जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे, असे प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय सरचिटणीस निमित पुनामिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनशी संबंधित जवळपास अडीच हजार सदस्यांना आपल्या दुकांनाना टाळे ठोकावे लागल्याचेही पुनामिया यांनी सांगितले. तसेच, प्लास्टिकबंदी भेदभाव करणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

23 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक उद्योगांना प्लास्टिकचं उत्पादन थांबवण्यास सांगितले होते. वन टाईम युझ बॅग, चमच, प्लेट्स, बॉटल यांचे वितरणही थांबवण्याचे आदेश होते. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे 23 जूनपासून महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकवरील बंदी लागू केली.

प्लास्टिक उद्योगातील बेरोजगारीचा महाराष्ट्राच्या विकासदरावर परिणाम होईल. तसेच, प्लास्टिक उद्योग क्षेत्राने काढलेल्या कर्जाच्या परताव्यावेळीसुद्धा अडचणी वाढणार आहेत.

महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली असून, पहिल्या वेळेस कुणाकडे प्लास्टिक सापडल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसऱ्या वेळेस 10 हजार आणि तिसऱ्या वेळेस 25 हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा आहे.

संबंधित बातम्या :