मुंबई : तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. कारण 23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे.


सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रुपयांपर्यंत कमी करण्यात यावा, हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

या प्लास्टिकवर होणार बंदी -

- चहा कप

- सरबत ग्लास

- थर्माकोल प्लेट

- सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल

- हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी)

- उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक

या प्लास्टिकवर कारवाई होणार नाही - 

- उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल

- हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं

- प्लस्टिक पेन

- दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर)

- रेनकोट

- अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक

- नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक

- टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक

- बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं