मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लातूरमधील हेलिकॉप्टर अपघाताला वैमानिक जबाबदार असल्याचं विमान दुर्घटना पथकाने आपल्या अंतिम अहवालात म्हटलं आहे. अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 25 मे 2017 रोजी लातूरमधील निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं.


'विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून वाचलो'

मागील वर्षी लातूरमधील हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले होते. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह आणखी तीन प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते. लातूरहून मुंबईला येण्यासाठी टेकऑफ करताना हायटेंशन वायरला धक्का लागल्याने हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचं नुकसान झालं, सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह कोणालाही दुखापत झाली नाही.

मात्र अतिरिक्त वजनासह वैमानिकांनी हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यावेळी प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. "वैमानिकांनी मोजलेलं वजन 4,940 किलो होतं. परंतु न मोजलेल्या 72 किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचं एकूण वजन सुमारे 5072 किलोंवर पोहोचलं होतं," असं अहवालात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

अपघाताच्यावेळी विमानाचं तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलं होतं, त्याचा परिणाम हेलिकॉप्टरच्या इंजिनावर झाला. उष्ण वातावरणात हेलिकॉप्टरला उड्डाण घेणं कठीण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीही जास्त वजन असल्याने त्याने उड्डाण करायला टाळायला हवं होतं, परंतु पायलटने हे नियम पाळले नाहीत. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही क्षणात हायटेंशन वायरमध्ये अडकल्याने ते खाली कोसळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.