मुंबई : इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर शिवसेना वारंवार भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेससह विरोधीपक्षांनी 'भारत बंद' पुकारला आहे, मात्र शिवसेनेने यामध्ये सहभाग घेतलेला नाही. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनवणी केल्यामुळे शिवसेनेने या 'बंद'ला समर्थन दिलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सत्तेत असूनही शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेने मुंबईत भाजपविरोधात पोस्टरबाजी केली होती. 'यही है अच्छे दिन' असा टोला लगावत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींवरुन सेनेने भाजपला लक्ष्य केलं होतं. अशावेळी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला शिवसेना पाठिंबा देणार का, अशी उत्सुकता सर्वांच्या मनात होती.

भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. काँग्रेससह देशातील विरोधीपक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये सहभागी होऊ नका, अशी विनवणी भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे. त्यामुळेच शिवसेना या बंदमधून बॅकआऊट झाल्याचं चित्र आहे.

शिवसेना आणि भाजप हे राज्यात आणि केंद्रात मित्रपक्ष आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता, तर त्याचे निराळे संकेत गेले असते, असं भाजपला वाटतं. त्यातच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर युतीचं घोंगडं भिजत पडलं आहे. त्यामुळे येनकेनप्रकारे भाजप सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे.

'इंधनदरवाढीला शिवसेनेचा विरोध आहेच. मात्र आमचा विरोध आमच्या परीने आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात इतर पक्षांपेक्षा आमचा आवाज मोठा आहे. आम्हाला सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्याची आवश्यकता नाही' असं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्याची माहिती आहे.

दरम्यान, शाह किंवा फडणवीसांकडून अशा प्रकारचा कोणताही फोन आला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे विचारपूर्वक निर्णय घेत असतात. जनता आणि महाराष्ट्राचं हित हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च असतं, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी-मनसेचा पाठिंबा

या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

देशभरातून कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा?

समाजवादी पक्ष, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तृणमूल काँग्रेस, आरएलडी, आरजेडी, सीपीआय, सीपीएम, एआयडीयूएफ, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, जेव्हीएम, डीएमके, आम आदमी पक्ष, टीडीपी, केरळ काँग्रेस (एम), आरएसपी, आययूएमएल, लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव), स्वाभिमानी शेतकरी संघटना