मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. अनंत करमुसे असे या तरूणाचे नाव असून तो कासारवडवली येथे राहायला आहे. वर्तक नगर पोलीस स्थानकांत यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी करत करमुसे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी राज्य सरकारला यावर 30 एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर आव्हाडांच्या बंगल्यावरील घटनेच्या दिवसाचं सीसीटिव्ही फूटेज तातडीनं हस्तगत करून ते ठाणे जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात जमा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.


तक्रारदार तरुणाच्या दाव्यानुसार जितेंद्र आव्हाड हे सत्ताधारी पक्षात असून ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस कदाचित निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. तेव्हा या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अनंत करमुसे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या काही पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते असेही या तरुणाचे म्हणणे आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असं सांगत उलट या तरुणावर दाभोळकर पानसरे यांच्या हत्येत या तरुणाचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.


Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड


लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांनी कोरोनाशी लढणाऱ्यांच्या सन्मानार्थ सर्व भारतीयांना एका रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले होते. याचा सर्वात पहिला विरोध हा जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र देशवासियांनी भरभरून पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचे बघितल्यानंतर अनंत करमुसे या ठाण्यातील कासारवडवलीत राहणार्‍या तरुणाने सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिली. दिवे लावणारे मूर्ख असतील तर आज अख्खा देश मूर्ख आहे का?, असा सवाल यातनं विचारण्यात आला होता. यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे एक अश्लील चित्र देखील या तरूणाने पोस्ट केले होते. यानंतर या तरुणाच्या आरोपानुसार त्यारात्री दोन पोलीस त्याच्या घरी आले. पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगत ते गाडीत बसवून आपल्याला थेट जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील 'नाद' बंगल्यावर घेऊन आले. हे पोलीस गणवेशात होते तसेच त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आल्यानंतर त्याला सर्वप्रथम फायबर, लाकूड आणि लोखंडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी त्याला काही प्रश्न विचारले. तरुणाच्या म्हणण्यानुसार प्रचंड मारहाण झालेली असताना त्याने आव्हाड यांची माफी मागत ती पोस्ट डिलीटही केली. मात्र तरीही पुन्हा आव्हाड यांच्यासमोर त्याला मारहाण करून वर्तकनगर पोलीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र पोलिसांनी तरुणाची अवस्था बघून त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी केली. यामध्ये त्याला जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणाने अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मारहाणीचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील या तरुणाच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.


संबंधित बातम्या :