मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत दक्षिण कोरियाहून आणलेल्या एका पेंग्विनचा मृत्यू झाला आहे. भारतात आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका मादीचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.


दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनला यकृतातील जीवाणू संसर्गामुळे जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. रविवारी सकाळी 8.15 च्या सुमारास पेंग्विनचा मृत्यू झाला.

26 जुलै 2016 रोजी पहिल्या टप्प्यात आणण्यात आलेल्या या पेंग्विन्समध्ये 3 नर आणि 5 मादींचा समावेश आहे. राणीच्या बागेतील क्वारेंटाईनमध्ये सर्व पेंग्विनना ठेवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियासारखं तापमानही राणीच्या बागेत तयार करण्यात आलं आहे. वॉटर क्वॉलिटीही पेंग्विनला अनुकूल ठेवण्यात येत आहे.

या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन कंपनीला जवळपास 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं. शिवाय पेंग्विन्ससाठी राणीच्या बागेत वेगळी व्यवस्था उभारण्यासाठीही 7 ते 8 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.