परभणी : पत्त्यात हरवल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलं आहे.


पूर्णा तालुक्यात पत्ते खेळताना जिंकलेल्या मित्राची इतर तीन जणांनी हत्या केली. तब्बल दोन महिन्यानंतर हा खून उघड झाला आहे. पोलिसांनी हा तपास लावण्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन करुन, दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तीन आरोपींना अटक केली.

पूर्णा तालुक्यातील पांगरा रोडवर असलेल्या आडगाव परिसरात ऑगस्ट महिन्यात एक मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचं प्रथमदर्शी पुराव्यावरुन स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. हा मृतदेह सिताराम यादव या 21 वर्षीय युवकाचा असल्याचं समोर आलं.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन करुन तपासाला सुरुवात केली. यादरम्यान तपास करणाऱ्या पोलिसांना वेषांतर करावं लागलं. पण सरतेशेवटी या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांचा हातात आलेच. सितारामच्या तीन मित्रांनी हत्या केल्याचं उघड झालं.

पत्ते खेळत असताना इतर मित्रांना हरवून सीतारामने पैसे जिंकले होते. त्याच्या रागातून सय्यद फारुख, विठ्ठल गौड, फिरोज शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.