मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन तीव्र झालं आहे. औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतली. त्याचा निषेध म्हणून मुंबईत बंद पाळण्यात येत आहे. सरकारकडून यावर प्रश्न कोर्टात प्रलंबित असल्याचंच उत्तर मिळत आहे. आता मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूवर पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका मुंडे साहेबांचीही होती आणि माझीही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडेंचा उद्या वाढदिवस आहे. औरंगाबादमधील घटनेमुळे आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

फेसबुक पोस्ट लिहून पंकजा मुंडेंनी आपलं मत मांडलं आहे. वाढिवसाच्या दिवशी भेटायला येताना कुणीही भेटायला येताना पुष्पहार, गुच्छ, केक, सत्कार साहित्य आणू नये, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं आहे.

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी


माझा वाढदिवस दरवर्षी मी अत्यंत साधेपणाने, माझ्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करते !!

यावर्षीही तसाच नियोजन होतं पण गेल्या काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झालं आहे. माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ 'काका साहेब शिंदे' याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं, तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही.

मी सर्व सुन्न होऊन बघत आहे आणि अगदी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्याची घाई ही केली नाही, कारण भावना, पीडा बाजूला ठेवून केवळ राजकीय भांडवल करणं मला कधी जमतच नाही.

एका उमेदीने, जग बदलण्याचा जिद्दीने आम्ही तरुण राजकारणात आलो आहोत, वंचित, पीडित यांचं जीवन बदलण्यास काही करण्यासाठी आम्ही राजकारण करत आहोत.

त्यात यशस्वी होण्यासाठी तशी शिवरायांच्या विचारातील पोषक समाज व्यवस्था हवी. या विषयी आजकाल चिंता वाटते पण सर्व पार पडेल  कारण हा छत्रपतींचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.

माझी  'काकासाहेब शिंदे' या माझ्या भावाला मनापासून श्रद्धांजली.

या परिवाराच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे.

सतत लोक शुभेच्छा देण्यासाठी येण्याची विचारणा करत आहे त्यामुळे कृपया नोंद घ्यावी मी वाढदिवस साजरा करणार नाही, पुष्पगुच्छ, सत्कार स्वीकारणार नाही.

मी 26 जुलै ला परळीत जाईन माझ्या वैद्यनाथाच दर्शन घेईन, समाजात प्रेम, सुख, शांती, विकास नांदो ही माझी जवाबदारी यशस्वी करण्याची माझ्या प्रतिज्ञा पुर्तीसाठी मी जाईन!!

मी लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी कटीबद्ध आहे. परत कोणत्या घरचा दिवा विझू नये हीच अपेक्षा आहे. भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो.

माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे  याचं समर्थन मुंडे साहेबांनी ही केलं होतं व आम्ही ही करतो ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व ओ बी सी वर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची देखील आहेच व माझी ही आहे. हे एकत्र शक्य होऊ शकेल असा मला पुर्ण विश्वास आहे. या साठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यासाठी मी व शासन कटिबद्ध आहोत.

आवश्यकता आहे ती धैर्याची !!

माझ्या भेटींसाठी परळीत येणाऱ्याना नम्र विनंती

कृपया कोणीही भेटी, पुष्पहार, गुच्छ, केक, सत्कार साहित्य आणू नये.

कर्तव्य प्रथम हेच मी शिकले आहे मला सहकार्य करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ...