मुंबई : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी 'पानी फाउंडेशन'च्या वतीने 'सत्यमेव जयते वॉटर कप 2019' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावर पानी फाऊंडेशनचे संस्थापक आणि अभिनेता आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली.


पुढील वर्षी 8 एप्रिल ते 22 मे 2019 या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला 75 लाख, द्वितीय क्रमांकाला 50 लाख आणि तृतीय विजेत्याला 40 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

याशिवाय प्रत्येक तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम 9 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.

निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांतील 76 तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. राज्याच्या जल समृद्धीचा प्रवास अखंड सुरु राहण्यासाठी पानी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे सहभागी झाले होते. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले होते.

स्पर्धेअंतर्गत पानी फाऊंडेशनच्या वतीने 'पाणलोट विकासा'चे प्रशिक्षण गावकऱ्यांना देण्यात येते. 45 दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील. ज्यामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.

'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने राज्यातील जलयुक्तशिवार अभियानातील श्रमदानाच्या या अनोख्या चळवळीतून आपण दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या अभियानात सत्यमेव जयते वॉटर कपचा अतिशय मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणाऱ्या आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ आणि पानी फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेच्या चौथ्या सत्रासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या स्पर्धेला सर्वांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा. आपले प्रत्येक योगदान हे महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीच्या प्रवासात अतिशय मोलाचे योगदान ठरणार आहे. अधिकाधिक गावांनी आणि गावकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. ही एक स्पर्धा नाही तर एक संघर्ष आहे. एक लढाई आहे. बहुमोल पाण्यासाठी हे युद्ध आहे. जलसाक्षरतेसाठी, जलसंवर्धनासाठी, पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी!  माझ्या शुभेच्छा तर आपल्यासोबत आहेतच. शिवाय राज्य सरकार संपूर्ण यंत्रणेसह आपल्या सोबत आहे.' अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

'पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायचा, भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवायची, हा उपक्रम प्रत्येक गावामध्ये घ्यायचा अशा प्रकारचं धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. पानी फाउंडेशनच्या वतीनं वॉटर कप स्पर्धा आयोजित करुन या कामाला एक गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.' याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आनंद व्यक्त केला.

किरण आणि मला सत्यमेव जयते वॉटर कप 2019 ची घोषणा करताना अत्यानंद होत आहे. दरवर्षीप्रमाणेच पानी फाऊंडेशनची संपूर्ण टीम वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता आम्हाला पुन्हा एकदा विकेंद्रीत जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व समजलं. निवडलेल्या 76 तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती आमीर खान यांनी सर्व गावांना केली.