संक्रांतीनिमित्त शेतातील नवधान्यासह महिला विठूरायाच्या दरबारी
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2019 10:59 AM (IST)
शेतात पिकलेलं नवधान्य विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातील महिला पंढरपुरात जमल्या आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
पंढरपूर : शेतात पिकलेले सर्व प्रकारचे नवधान्य विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातून हजारो महिलांनी आज विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी केली. पहाटेपासून हजारो महिला ताटात हळद, कुंकू, तिळगूळ आणि शेतात आलेले ऊस, बोर, गाजर, हुरडा यासह सर्व प्रकारची धान्य अर्थात शेतातील पहिले पीक देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. महाराष्ट्रासोबतच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमधूनही भाविक मोठ्या संख्येने मंदिरात आले आहेत. विठुरायाच्या चरणी हे धान्य अर्पण केल्याने पुढील वर्षभर शेतात भरघोस पीक येऊन शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट संपून जाते, अशी या शेतकरी महिलांची भावना असते. मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला दागिन्याने सजवण्यात आले असून विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. महिलांनी रुक्मिणी मातेला या नवधान्याचे वाण अर्पण करत इतर सवाष्ण महिलांना हे वाण दिले. मंदिर समितीने आज खास महिलांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केली असून रुक्मिणी मंदिरात फक्त महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांना वाणवसा करायचा दिवस असल्याने पुरुषांनी मंदिरात गर्दी करु नये, असे आवाहन समितीने केले आहे.