पालघर : पालघरमधील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेने अनोखं नामकरण आंदोलन केलं. या नामकरण आंदोलनामधे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सावरा, खासदार कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे यांची नावं खड्डेमय रस्त्यांना देण्यात आली.


वाडा तालुक्यातील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र प्रशासन तसेच तालुक्यातील मंत्री, आमदार, खासदार याची दखल घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवरील खड्यांना मंत्री, खासदार आणि आमदारांची नावं देण्याचं अनोखं आंदोलन आज वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं.

भिवंडी-वाडा-मनोर या मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्ता आहे की खड्डा हे कळणं मुश्किल झालं आहे. काही रस्ते तर मे महिन्यात बनवण्यात आले असून जून महिन्यातच त्याची दुर्दशा झाल्याची अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बांधकाम प्रशासनाकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नाही. मुख्य रस्ता असलेला भिवंडी-वाडा रस्त्यासाठी टोल आकारला जात असतानाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत.

त्यामुळे विष्णु सावरा, कपिल पाटील, शांताराम मोरे यांची नावं खड्डेमय रस्त्यांना देऊन प्रशासनासह आमदार, खासदार आणि मंत्र्यांचं लक्ष वेधण्याचं काम मनसेने केलं.