नांदेड : मी सादर केलेला अर्थसंकल्प तुटीचा आहे, पण माझ्यावर केवळ दारु पिणारे नाराज आहेत. दारुची दुकानं बंद होत असली, तरी वित्तीय तूट येणार नाही, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते.


“शेतकरी कर्जमाफीवर विरोधक केवळ राजकारण करत आहेत. 2009 साली संपूर्ण देशात शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली होती. पण त्यानंतरही महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या का करतात, यावर चिंतन झाले पाहिजे. तरच उपाय मिळेल.”, असे अर्थमंत्री सुधीर  मुनगंटीवार म्हणाले.

मी जो अर्थसंकल्प सादर केला आहे, तो सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. मी या अर्थसंकल्पात केवळ दारू पिणाऱ्यांवर कर वाढवला आहे. त्यामुळे राज्यात केवळ दारू पिणारे हे माझ्यावर नाराज असू शकतील, असेही अर्थमंत्री म्हणाले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या बजेटमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अर्थात 14 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. परिवहन, मुद्रांक आणि उत्पादन शुल्क या विभागांकडून यावेळी कमी महसुली मिळाला आहे. शिवाय, राज्यातील 15 हजार 500 मद्याविक्री दुकाने बंद होणार आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा कुठलाही परिणाम राज्याच्या तिजोरीवर होणार नाही असे अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे.