अहमदनगर जिल्ह्यात फक्त 27 शेतकऱ्यांना कर्जमाफी
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2017 10:28 PM (IST)
जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. मात्र सरकारने केवळ 27 शेतकऱ्यांचीच दिवाळी गोड केली.
अहमदनगर : कर्जाफीसाठी अर्ज केलेल्या अहमदनगरमधील केवळ 27 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यातील दोन जणांना बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तर उर्वरित 25 जणांना पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमाफी दिली जाणार आहे. राम शिंदे यांनी पारदर्शक आणि खऱ्या लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी निकष लावल्याचा दावा केला आहे. मात्र 18 तारखेचा मुहूर्त जाहीर करत सरकारने मोजक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांची दिवाळी कडूच असणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 90 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. मात्र सरकारने केवळ 27 शेतकऱ्यांचीच दिवाळी गोड केली. उर्वरित शेतकऱ्यांना कधी आणि किती कर्जमाफी होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. उर्वरीत अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सरकारने अनेक वेळा जाहीर भाष्य करत कर्जमाफी देऊन दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं. 18 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळं अनेक लाभार्थीं शेतकरी अजूनही थेट लाभाच्या प्रतीक्षेत असून त्यांची धाकधूक कायम आहे.