ठाणे : आगामी निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींचं भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. विठ्ठल शेलार आणि पवन पवार सारख्या गुंडांना पक्षात एन्ट्री मिळाल्यानंतर भाजपवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. मात्र त्यानंतरही पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने धडा घेतलेला दिसत नाही. कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली आणखी मंडळी भाजपच्या वाटेवर आहेत.


पवन पवार, श्याम शिंदे, विठ्ठल शेलार आणि आता सुधाकर चव्हाण असा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणखी एक चेहरा भाजपमध्ये दाखल होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे ठाण्यात पक्षाचं निष्ठेने काम करणारा मोठा गट नाराज आहे.

सुधाकर चव्हाण यांचा इतिहास

केवळ निवडून येण्याची क्षमता हा निकष कसा काय असू शकतो?, असा सवाल खाजगीत विचारला जातोय. कारण संघशिस्तीच्या भाजपात येण्याची इच्छा असलेल्या सुधाकर चव्हाणांचा इतिहास वेगळंच सांगतो.

ठाण्यात 90 च्या दशकात सुधाकर चव्हाण रिक्षा चालवण्याचं काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. 2012 ला मनसेच्या तिकीटावर त्यांनी शिवाई परिसरातून पालिकेत एन्ट्री केली. मात्र पक्षाची शिस्त न पाळल्यानं मनसेने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.

परिवहन समिती, स्थायी समितीसारख्या अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. पण त्यांच्या राजकीय प्रवासाइतकीच गुन्हेगारी पार्श्वभूमीही गडद आहे.

सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा लोकांना फक्त पक्ष वाढवण्यासाठी का घेतलं जातंय, असा सवाल विचारला जातोय.

उल्हासनगरमध्येही गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या पप्पू कलानींचा मुलगा ओमी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत ओमी कलानीवर सुनील सुखरामानीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीआयडीने ओमीला अटक करुन कोर्टातही हजर केलं होतं. त्यामुळे अशा लोकांच्या जीवावर भाजप स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणार का?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत शाश्वत धर्मासाठी राष्ट्रवादीतील अनेक डागाळलेले चेहरे भाजपात घेतले. त्यामुळे संघशिस्तीच्या भाजपला गुन्हेगारांचं वावडं राहिलं नाही का?, की भाजपचा खरा चेहरा आता समोर येतोय?, असा प्रश्न विरोधकांनी विचारला तर आश्चर्य वाटायला नको.

भाजपने पक्षात स्थान दिलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते

पवन पवार :

  • खून, खंडणी, जमीन बळकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या 15 गुन्ह्यांची नोंद

  • पोलीस हवालदाराचा खून केल्याप्रकरणात पवन पवार मुख्य आरोपी

  • नगरसेवक झाल्यावरही प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी जेलची हवा


 

पिंटू धावडे :

  • खंडणी, हत्या आणि मारामारी करुन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद

  • तुरुंगातच कुख्यात बाबा बोडके यांच्यासोबत धावडेची ओळख झाली

  • कनिष्ठ न्यायालयाने पिंटू धावडेची निर्दोष मुक्तता केली

  • 2012 साली राष्ट्रवादीने अप्पर इंदिरानगरमधून उमेदवारी दिली, नगरसेवक म्हणून निवड झाली.


 

श्याम शिंदे :

  • पोलिसाला मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद

  • 20 जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • 37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेर

  • विधीमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश पार पडला


 

विठ्ठल शेलार :

  • 2008 पासून विठ्ठल शेलारवर तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद

  • 2010 आणि 2012 मध्ये हत्येचे दोन गुन्हे शेलारवर दाखल

  • 14 फेब्रुवारी 2012 ला दत्तात्रय तिकोणे आणि ज्ञानेश्वर कांबळेचं अपहरण करुन पिरंगुटच्या जंगलात हत्या केल्याचा आरोप

  • दोघांचेही मृतदेह घोटवडे गावाजवळील दगडखाणी जाळून राख नदीत फेकल्याचा आरोप

  • अडीच महिन्यांपूर्वी शेलारकडून दोन पिस्तुल जप्त करुन अटक करण्यात आली

  • 2014 मध्ये विठ्ठल शेलारवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.