अहमदनगर : खंडणीसाठी 16 वर्षीय मुलाचं अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात ही घटना घडली. अक्षय पानवकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.


श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू गावात राहणारा अक्षय शनिवारपासून गायब होता. शेजारच्या गावात यात्रा असल्याचं सांगून अक्षय गेला होता. मात्र तो परत आला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण खंडणीखोरांकडून अक्षयच्या सुटकेसाठी त्याच्या कुटुंबियांकडे 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

20 लाख रुपये द्या, अन्यथा मुलाला मारलं जाईल, अशी धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली होती. मात्र मंगळवारी म्हणजे आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस परिसरात अक्षयचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी काष्टी गावातील दोन अल्पवयीन मुलांसह अमोल कोकरे, अजय मांढरे अशी चौघांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे दिवसभरातील अपहरण करुन हत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. औरंगाबादमध्येही 10 वर्षीय मुलाची खंडणीसाठी अपहरण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

संबंधित बातमी : औरंगाबादमध्ये खंडणीसाठी 10 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या