मुंबई : खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आता पालकांनाही मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेत 25 टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करु शकतील.


येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही नवी तरतूद लागू करण्यात येणार आहे. सरकारकडून लवकरच यासंदर्भात वटहुकूम काढण्यात येणार आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत घोषणा केली.

फी शुल्क नियंत्रण कायद्यात बदल होणार असून, 2011 च्या कायद्यानुसार फक्त पालक-शिक्षक संघटनांनाच (PTA) फी शुल्क वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार होता.

शाळेतील अतिरिक्त साहित्य खरेदी बंधनकारक नसल्याचं सुद्धा तावडे यांनी स्पष्ट केले असून, जूनच्या आधी निकष ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

केंद्राच्या आदेशानुसार शाळेची गुणवत्ता आणि दर्जा पालकांना कळण्यासाठी सेल्फ डिक्लेरेशनला गती दिली जाईल, अशीही माहिती तावडेंनी दिली.