मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरांतील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळला. त्यामुळे अनेक नागरिकांना पुन्हा नोटाबंदीच्या काळातील मन: स्ताप सहन करावा लागला.


नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे 1 एप्रिल रोजी बँकांचे कामकाज बंद होते. तर रविवारी बँकांना सुट्टी, आणि मंगळवारी रामनवमीच्या सुट्टीमुळे राज्यातील सर्व एटीएम रिकामे झाले होते. त्यातच रिझर्व बँकेकडून बँकांना अपेक्षित आर्थिक पुरवठा होत नसल्याने एटीएममधूनही मुबलक रक्कम उपलब्ध करुन देण्यात येत नव्हती. याचाच परिणाम गेल्या दोन दिवसांमध्ये दिसून येत होता.

औरंगाबादमधील 700 पैकी बोटावर मोजण्या इतक्याच एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांना पैसे असलेल्या एटीएम सेंटरच्या शोधात चांगलीच पायपीट करावी लागली. शहरातील सिडको-हडको, जवाहर कॉलनी, सूतगिरणी, उल्कानगर आदी परिसरातील बहुतांश ठिकाणचे एटीएम रिकामे होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला.



तर दुसरीकडे रविवारी 3 मार्च रोजी नवी मुंबईतील पनवेल जवळच्या कामोठ्यामध्ये असेच काहीसे चित्र होते. कामोठेमधील सर्व एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे नागरिकांना पैसे असलेल्या एटीएमचा शोध घ्यावा लागत होता. कामोठ्यातील सेक्टर 22 मधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

2 एप्रिल रोजी मुंबईच्या अंधेरीमधील चकाला परिसरातील सर्व एटीएम सेंटर रिकामे होते. तर पुण्यात 9 एटीएम सेंटर पैकी एकच एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध असल्याने पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.

एटीएममध्ये खडखडाट असल्याचे पाहून अनेकांना सरकारने पुन्हा अघोषित नोटाबंदी केली असल्याची अनेकांची भावना होती. बँकांकडून पुकारण्यात आलेल्या अघोषित नोटाबंदीमुळे कडाक्याच्या उन्हात चांगलीच दमछाक झाली होती.