मुंबई : आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. 


संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी हा खटला सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना म्यॉव म्यॉव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीनं करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचं राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण? 
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. 


या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. ज्यात आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा सत्र न्यायालयानं स्वीकारला होता. त्या विरोधात नितेश राणेंसह इतरांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :