Nitesh Rane :  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. शिवसेनेच्या संतोष परब (Santosh Parab)  हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी जामीन नाकारला. नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. तर राणेसाहेब मुलाला हजर करा, असे म्हणत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना टोला लगवाला आहे. 


गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी फटाके फोडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी कणकवलीचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 


काय म्हणाले वैभव नाईक ?
एखाद्याचा जामीन अर्ज फेटाळला.. हा काही आनंदाचा दिवस नाही. कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दोन दिवसांपासून नितेश राणे आणि नारायण राणे पोलिसांनी आपल्याला गुंतवलं असल्याचा आरोप करत आहेत.  पण नितेश राणे यांच्याविरोधातील पुरावे कोर्टानेही मान्य केले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री असल्यामुळे कोर्टाचा निर्णय मान्य करावा. कायद्याचा निर्णय मान्य करावा आणि आपल्या मुलाला पोलीस स्थानकात हजर करावे. राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे वैभव नाईक म्हणाले. 


हायकोर्टात जाणे हाच पर्याय - 
हायकोर्टात जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नसल्याची माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे.  आता न्यायालयाची वेळ संपली आहे. उद्या आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. उद्या आम्ही हायकोर्टात गेलो तरी सुनावणी होण्यास पुढील दोन तीन दिवस जाणार असल्याचे देसाई म्हणाले. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत नितेश राणे पोलिसांपासून वेगळे राहू शकतात, असे देसाई म्हणाले. आम्हाला तसा कायदेशीर अधिकार आहे. जर हायकोर्टात नाहीच गेलो तर कोर्टात हजर राहण्याचा पर्याय देखील आमच्यासमोर असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. नितेश राणे यांच्याबद्दलची ऑर्डर कॉपी अद्याप आम्हाला मिळालेली नाही. मात्र, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे असणारे मोबाईल जप्त करायचे आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या बाजून पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. गरज पडल्यास आणखी मदत करु असेही ते यावेळी म्हणाले. यापूर्वी नितेश राणे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले होते असेही यावेळी देसाई यांनी सांगितले.



काय आहे प्रकरण? 
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.