16 फूट उंच, 10 फूट रुंद अन् 4 टन वजन, किल्ले रायगडाला नवीन महादरवाजा
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2016 03:03 PM (IST)
रायगड : 'रायगड' म्हटलं की नजरेसमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा रायगड किल्ला. छत्रपतींचा हा किल्ला आता काहीसं नवे रुप धारण करु लागला असून पुरातत्व विभागामार्फत किल्ले रायगडावरील प्रवेशद्वारावर इतिहासाची साक्ष देणारा असा नवा महादरवाजा बसविण्यात आला आहे.
शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून भरीव प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी राज्य सरकारने 550 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. तर किल्ल्याच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे पुरातत्व विभागही आता किल्ल्याच्या संवर्धनाबाबत सजग झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला नवीन प्रवेशद्वार बसवण्यात आला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाला पुरातत्व विभागाने नवीन दरवाजा बसवला आहे. औरंगाबाद येथे या नवीन दरवाजाची निर्मिती करण्यात आली असून सुमारे 16 फुट उंच, 10 फूट रुंद आणि 4 टन वजन असलेला हा भव्य दरवाजा अस्सल सागवानी लाकडातून बनवण्यात आला आहे. यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी पुरातत्व विभागाने खर्च केला आहे.
दहा दिवसांपुर्वीच हा दरवाजा किल्ल्यावर आणण्यात आला होता. चार दिवस दरवाजा बसवण्याचे काम सुरु होते. हे काम बुधवारी पुर्ण झाले. यामुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांनी इतिहासाची साक्ष देणारा हा नवा दरवाजा आकर्षण बनला आहे. नव्याने बसवण्यात आलेल्या या दरवाजामध्ये एक छोटा 'दिंडी' दरवाजा तयार करण्यात आला असून किल्ले रायगडावरील महादरवाजावरील हे प्रवेशद्वार हे सूर्यादय ते सूर्यास्तादरम्यान उघडं ठेवण्यात येणार आहे. तर किल्ले रायगडावर बसवण्यात आलेल्या या महादरवाजामुळे गडाच्या आकर्षणात भर पडली आहे.