सांगली : शासकीय प्रसूती केंद्रातील डॉक्टर, कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे एका अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या संघर्षाला तब्बल 9 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. सांगलीच्या तासगावमधील घटनेप्रकरणी मानवी हक्क आयोगाने गेल्यावर्षी निकाल दिला होता. या निकालाचा आधार घेत राज्य शासनाने मिरज वैद्यकीय महाविद्यालयास संबंधित मृत अर्भकाच्या मातेस 11 लाख 87 हजार रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. या रकमेचा धनादेश नुकताच त्या मृत अर्भकाच्या मातेस देण्यात आला.


तासगावमध्ये राहत असलेल्या या कोळीगुड्डे कुटुंबातील अनुश्री सुरेश कोळीगुड्डे यांच्या पोटी 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2009 साली बाळ जन्माला आले होते. मात्र हे बाळ अल्पायुषी ठरले. 29 डिसेंबर 2009 रोजी जन्मलेले बाळ 31 डिसेंबर रोजी मयत झाले. तासगावमधील शासकीय कस्तुरबा प्रसूती केंद्रात या बाळाचा जन्म झाला होता. तेथील डॉक्टर, कर्मचार्‍यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे या बाळाचा मृत्यू झाला होता.

बाळाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कोळीगुड्डे कुटुंबियांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी याबाबत संबंधित विभागाकडे शासकीय प्रसूती केंद्रातील तत्कालिन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सुरक्षा रक्षक यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत तक्रार केली. त्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याबाबतची मागणी या कुटुंबाने मानवी हक्क आयोगाकडे केली होती. तासगाव मधील मास फॉर सिटीझन संघटनेने याचा पाठपुरावा केला.