मुंबई : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशी भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.


अण्णाभाऊ हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहीरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबध्द केले आहेत. एकही दिवस शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंनी विश्व साहित्यात आपला ठसा उमटवला असेही जयंत पाटील यांनी सांगितले.


अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला स्तालिनग्राडचा पोवाडा रशियात प्रचंड गाजला. अण्णाभाऊ यांची तुलना रशियन कांदबरीकार दोस्काव्होस्की यांच्याशी केली जाते. ज्यांनी सातासमुद्रापार देशाची मान उंचावली त्या व्यक्तीचा सन्मान आपल्या मायभूमीत व्हायला हवा. अण्णाभाऊ यांचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुध्द लढणारे आहेत. समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या, त्याचे प्रश्न मांडणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळायलाच हवा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.


अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री जयंत पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शिल्पशृष्टीची पाहणीही केली.


मुंबईत लवकरच अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक उभारणार- मुख्यमंत्री 


अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.


अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या, खासदार अमोल कोल्हेंची मागणी


स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे  राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.