मुंबई : 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. या शिवस्वराज्य  यात्रेत 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.


शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा या यात्रेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेवून जाणार आहेत.

या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार आहे. त्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहे. ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात, देशात लोकशाहीने चालतो. सरंजामशाही शाहीचा काळ कधीच संपला आहे. परंतु संरजामशाहीला अपवाद होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्याकाळातही या युगपुरुषाने रयतेचे राज्य आणले. शेकडो वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान कोट्यावधी लोकांच्या हदयात आदराचे आहे, असे पाटील यावेळी म्हणाले.

सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने शिवस्वराज्याची सनद देवून आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेवून जाणार आहोत, असे पाटील म्हणाले. या शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले,  खासदार डॉ. अमोल कोल्हे करणार आहेत.