MPSC Student Protest in Pune : एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या योग्यच असून आपण त्यांच्या पाठिशी आहोत, येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार थेट विद्यार्थ्यांमध्ये सामील झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शरद पवारांच्या आगमनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच उत्साह संचारला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीनं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.


यावेळी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून आपण मुख्यमंत्र्याची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या. अशा प्रकारचं लेखी निवेदनही त्यांनी दिलं. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचं आश्वासन दिलं."


विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाने आपल्यासोबत यावं असंही शरद पवारांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे तुमची बाजू मांडणं आवश्यक आहे असंही शरद पवार म्हणाले. 


पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ पवारांसोबत जाणार


शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांचं शिष्टमंडळ हे शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या शिष्टमंडळात कोण असणार याची नावंही विद्यार्थ्यांनी जाहीर केली.


यावेळी शरद पवारांना विद्यार्थ्यांनी जागा करून दिली आणि शरद पवार विद्यार्थी आंदोलनच्या मधोमध पोहोचले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना खुर्ची देऊ केली पण पवारांनी ती नाकारली आणि उभं राहून संवाद साधला.


एमपीएससची बदललेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा यासाठी विद्यार्थ्यानी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल रात्री या आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या, त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आंदोलन कायम ठेवलं. या आधी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रोहित पाटील, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार सत्यजीत तांबे यांनीही भेट दिली आहे. 


सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर टीका


या आंदोलनाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट दिली. देशाला आधार देणाऱ्या भावी पीढीला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैवी असून राज्य सरकार यावर निर्णय घेत नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या. आजारी असलेल्या बापट साहेबांना भाजप प्रचारात उतरवू शकतात मग या विद्यार्थ्यांच्याही जिवाशी खेळायला ते कमी करणार नाहीत असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 


सोमवारपासून  पुण्यातल्या (Pune News) झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. 


मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न (New MPSC Pattern 2025)  लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


'या' आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या


एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये. अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा अशा मागण्या या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत. नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे असल्याने त्यासाठी मराठीतून पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 


ही बातमी वाचा: