Eknath Khadse On Eknath Shinde: हा कसा फुटला, तो कसा फुटला आणि आपण सरकारमध्ये कसे आलो? यावरच मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक समस्या असताना विकासाच्या प्रश्नांवर बोलत नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ते पाचोरा तालुक्यातील लोहारीमध्ये बोलत होते.  

  
जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन वेळा आले, तीन वेळा सभेत भाषण करताना त्यांनी शिवसेनेतून बाहेर कसे पडलो, गुवाहाटी कसे गेलो, हीच कॅसेट वाजवली अशी टीका करत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा होती, मात्र ते देऊ शकले नाहीत असा टोलाही यावेळी एकनाथ खडसेंनी लगावला आहे.


जळगाव जिल्ह्यातल्या अनेक प्रश्न प्रलंबित असताना, दुसरीकडे प्रोत्साहन पर अनुदानातपर्यंत मिळालेले नाही. कर्जमाफीची सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही, पीक विमा कंपनीची ही बोंबाबोंब सुरू आहे. असे एकंदरीतच शेतकरी मोठ्या अडचणीत असताना त्यावर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुर्लक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेत विकासावर कुठल्याच पद्धतीने चर्चा झाली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेची अडचण नव्हती. मात्र त्याकडे एकनाथ शिंदेंचे दुर्लक्ष झाल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.


मंगेश चव्हाण मुख्यमंत्री गाडी चालवली -


भाजपच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांची गाडी चालवणे हे प्रोटोकॉलच्या बाहेर आहे. मात्र नियम ढाब्यावर बसून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता सध्या महाराष्ट्रात कोण कुठे काय चालवत असे म्हणत एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. 


मराठा विद्या प्रसारक संस्था वाद पोलीस कारवाई -


विजय भास्कर पाटील यांच्या विरोधात प्रकरणातील दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जी कारवाई केली त्यावरूनही एकनाथ खडसेंनी पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. विजय भास्कर पाटील हे का गुन्हेगार किंवा दररोज दरोडेखोर होते का? 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले. जेवढे तत्परता विजय भास्कर पाटील यांच्या भावाला पकडण्यासाठी पोलिसांनी दाखवले तेवढेच तत्परता मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याला पकडण्यासाठी पोलिसांनी लावले असती. ते पकडले गेले असते, मात्र मात्र एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो. कुणाच्यातरी सूचनावरूनच पोलीस काम करत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.