मुंबई : राज्यात युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला आपले किमान दहा खासदार निवडून येतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत चाचपणीत दहा जागांवर उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दहा जणांमध्ये पाच विद्यमान खासदारांचा समावेश आहे. बारामती (सुप्रिया सुळे), माढा (विजयसिंह मोहिते-पाटील), कोल्हापूर (धनंजय महाडिक), सातारा (उदयनराजे भोसले), भंडारा-गोंदिया (मधुकर कुकडे) या मतदारसंघातील खासदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे.
राष्ट्रवादीचे पाचही विद्यमान खासदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात
याव्यतिरिक्त रायगडची जागा सुनील तटकरे खेचून आणतील तर मावळमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तसंच शिरुर, बुलढाणा, परभणी या जागांवर राष्ट्रवादीला विजयाची शक्यता वाटते.
शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा असून बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचं नाव निश्चित असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या किमान दहा जागांवर विजय मिळेल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे.