Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) चांगलेच ढवळून निघालं आहे. गेल्या 7 दिवसांपासून शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात आल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं पुढाकार घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले आहे. 'उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे' अशा नावाचे होर्डिंग त्याठिकाणी लावले आहेत.

  
शिवसेनेतील बंडाळी उफाळून आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या बाजूने उभी राहिली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये ' उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे ' असे होर्डिंग लावण्यात आलं आहे. नाशिक-औरंगाबाद रोडवर लावण्यात आलेलं होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  निफाड तालुक्यात कायमच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात राजकीय संघर्ष बघायला मिळाला आहे. मात्र, सध्याच्या अस्थिर वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविणारे होर्डिंग लावल्यानं सत्ता संघर्षाचे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याचे निदर्शनास येतं आहे.




सत्ता संघर्षाचा आज सातवा दिवस


महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.